पंडिता रमाबाई
पंडिता रमाबाई
1881 मध्ये कोलकाता शहरात एका वीस वर्षांच्या युवतीचे आगमन झाले आणि तिच्या विद्वत्तेच्या तेजाने, संस्कृतवरील प्रभुत्वाने तेथील सामाजिक पुढारी चकित झाले. कलकत्त्याच्या विद्वान मंडळींनी या युवतीचा सत्कार घडवून तिला ‘सरस्वती’ उपाधी बहाल केली. विशेष म्हणजे ‘रमाबाई डोंगरे’ हे नाव धारण करणाऱ्या या युवतीचे नाव महाराष्ट्रात तोपर्यंत कुणीही ऐकले नव्हते. त्यानंतर प्रसिद्धीचे वलय होऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे व पुण्याजवळील केडगाव ही त्यांची उर्वरित आयुष्यातील कर्मभूमी बनली. कलकत्त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती चिकटलेले प्रसिद्धीचे वलय त्यानंतर त्यांना संपूर्ण आयुष्यभर चिकटले.
समाजसुधारक, विदुषी, ख्रिस्ती मिशनरी असलेल्या पंडिता रमाबाईंच्या स्मृतिशताब्दीची पाच एप्रिल रोजी सांगता होत आहे
पंडिता रमाबाई तर चाकोरीबद्ध वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. ज्या काळात महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसे त्या काळात कुटुंबातील वा नातलगांमधील कुणाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखविले. त्यांच्या स्वत:च्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील सर्व अनाथ आणि असाहाय्य घटकांचा सांभाळ करण्याच्या वृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदूषीने खंबीरपणे तोंड दिले. पंडिता रमाबार्इंचे जीवन म्हणजे सतत संघर्षाशी झुंजणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत लढून जीवनमूल्यांशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीची गाथाच आहे.
पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटकात मेंगलोरजवळील गंगामूळ या गावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री (अनंतपद्मनाभ) परमेश्वर डोंगरे हे संस्कृतपंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुळातील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला, लक्ष्मीबाईला संस्कृत शिकविले. रमाबाई केवळ सहा महिन्यांच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. पंधरा वर्षे तीर्थार्टन केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाख्यात पोहोचले. त्यावेळी तेथे भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने अनंतशास्त्रींचा आणि त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई पोरके बनले. तेथूनच रमाबाईंच्या संघर्षमय आयुष्याला सुरुवात झाली.
आई-वडिलांच्या निधनानंतर या तरुण भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालूच ठेवली. त्यानंतर काही महिन्यातच रमाबाईंच्या थोरल्या बहिणीचे कृष्णाबाईचे निधन झाले. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाईंनी संस्कृतचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान संपादन केले होते. पुराण सांगत आणि संस्कृतमधून व्याख्याने देत हे बहीण-भाऊ पुढे फिरतच राहिले. तीन-चार वर्षे हजारो मैलांचा पायी प्रवास करत श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाई 1878 साली कलकत्त्यात पोहोचले. या शहरात मात्र या भाऊ-बहिणीच्या ज्ञानाची कदर करणारे लोक त्यांना भेटले. ब्राह्मो समाजाच्या आणि कोलकातातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणांना आदराची वागणूक दिली.
श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाईंच्या या संस्कृतवरील प्रभुत्वाने कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकित झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात या महिलेचे संस्कृतवरील प्रभुत्व ही निश्चितच कौतुकाची बाब होती. कलकत्ता विद्यापीठात झालेल्या विद्वानांच्या सभेत यावेळी रमाबाईंना ‘सरस्वती’ उपाधी सन्मानाने देण्यात आली. तेव्हापासून रमाबाई डोंगरे ही युवती ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ या नावाने संपूर्ण हिंदुस्थानभर ओळखली जाऊ लागली.
रमाबाईविषयी मुंबईच्या एका दैनिकात 1878 च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली:
“हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.”
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी शिकली, बावीस वर्षे ओलांडून अजून ती अविवाहित कशी, मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही, असे विविध प्रश्न रमाबाईंविषयी मुंबई-पुण्यात विचारले जाऊ लागले. महाराष्ट्राला रमाबाईंची ओळख झाली ती अशाप्रकारे. पंडिता रमाबाईंच्या जीवनातील अनेक घटनांनी पुढील काळात महाराष्ट्रातील सामाजिक जीवन अनेकदा ढवळून टाकले.
त्यानंतर रमाबाई आणि त्यांचे बंधू आसामात सिल्हट येथे आणि बंगालमधील ढाका येथे गेले. ढाक्यात असताना श्रीनिवासशास्त्री आजारी पडले. तेथे त्यांचे 8 मे 1880 रोजी निधन झाले. श्रीनिवासशास्त्री हयात असताना त्यांची आणि रमाबाईंची बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली व्यक्तीशी ओळख झाली.
श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर बिपीन बिहारींनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली आणि 13 जून 1880 रोजी बांकीपूर शहरात रजिस्ट्रारसमोर नोंदणी पद्धतीने या दोघांचा विवाह झाला.
त्याकाळात रमाबाईंनी नोंदणी पद्धतीने विवाह केला या घटनेने पुन्हा एकदा समाजात खळबळ उडाली. लग्नानंतर सिल्हट येथे बिपीन बिहारीदास वकिली करत असत. 16 एप्रिल 1881 रोजी रमाबार्इंच्या मनोरमा या मुलीचा जन्म झाला.
रमाबाईंना वैवाहिक सुख फार काळ लाभले नाही. लग्नानंतर केवळ 19 महिन्यांनंतर बिपीन बिहारींचा 4 फेब्रुवारी 1882 रोजी अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला. आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पंडितारमाबाईंनी महाराष्ट्राची वाट धरली.
रमाबाई महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच या विदूषीची महाराष्ट्राला ओळख झाली होती. पुण्यात आल्यावर रमाबाईंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले. रमाबाईंच्या पुण्यातील वास्तव्यात त्यांच्याविरुद्ध समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई रानड्यांनी पंडिता रमाबाई भावनिक आधार दिला.
पुण्यात पंडिता रमाबाई आगमन झाल्यानंतर या तेजस्विनीच्या सभा आयोजित करण्यात प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे आणि रमाबाई रानड्यांनी पुढाकार घेतला.
याच काळात ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू. हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षरमाबाईंची हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष त्यावेळी खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलीत सामाजिक व्यवस्थेमुळे या देशात महिला डॉक्टरांची खूप गरज आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी असे त्यांनी या साक्षीत सुचविले.
हंटर कमिशनच्या सदस्यांनी यावेळी रमाबाईंची उलटतपासणीही घेतली. रमाबाईंना त्यावेळी इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीतून साक्ष दिली. रमाबाईंच्या साक्षीने खुद्द सर हंटर फारच प्रभावित झाले. त्यांनी रमाबाईंच्या
साक्षीचे इंग्रजी रूपांतर करून छापून घेतले, इतकेच नव्हे तर इंग्लंडला परतल्यानंतर तेथे रमाबाईच्या कार्यासंबंधी व्याख्यानही दिले.
त्यानंतर थोड्याच काळात पंडिता रमाबाईंनी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. त्यांची मुलगी मनोरमासुद्धा त्यांच्याबरोबर होती. इंग्लंडमध्ये असतानाच वॉण्टेज शहरात त्यांनी आपल्या मुलीसह 29 सप्टेंबर 1883 रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
या घटनेपासून या विदूषीच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. रमाबाई इंग्लंडला गेल्या तर तेथे त्या ख्रिस्ती होतील ही महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांची भीती खरी ठरली. अपेक्षेप्रमाणे या घटनेने त्याकाळात महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.
इंग्लंडमध्ये 1886 पर्यंत म्हणजे तीन वर्षे राहून रमाबाईंनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान महाराष्ट्रातून आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला, तर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पंडिता रमाबाई या दुसऱ्या महाराष्ट्रीयन महिला. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना समाजाचे नेते डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या अन्नपूर्णा किंवा ॲना तर्खडकर इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला.
आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई सरस्वती यांची पूर्वी कधीही गाठभेट झाली नव्हती. मात्र आनंदीबाईंच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंडिता रमाबाई कन्येसह इंग्लंडहून अमेरिकेत गेल्या.
आनंदीबाईंच्या पदवीदान समारंभानंतर रमाबाईंचे अमेरिकेत अडीच वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या विविध भागांत व्याख्याने दिली. अमेरिकेतील महिलांच्या संस्था, तेथील शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अमेरिकन जनतेत भारतातील महिलांच्या, विशेषत: बालविधवांच्या परिस्थितीबाबत जागृती निर्माण केली. या जागृतीमुळे हिंदुस्थानात पंडिता रमाबाईंच्या महिलांविषयक कार्यास मदत करणाऱ्या ‘रमाबाई असोसिएशन’ या संस्थेचा जन्म झाला. हिंदुस्थानात हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची हमी या संस्थेने स्वीकारली.
हिंदुस्थानात उच्चवर्णीय बालविधवांसाठी शाळा चालविणे हे रमाबाई असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. या शाळेची शैक्षणिक पद्धती पूर्णत: पंथरहित असावी, असा या संस्थेच्या घटनेत महत्त्वाचा नियम होता. रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळात रावबहादूर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादूर महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता.
भारतात परतल्यानंतर पंडिता रमाबाईनी रमाबाई असोसिएशनच्या वतीने मुंबईत चौपाटीजवळ 11 मार्च 1889 रोजी ‘शारदा सदन’या संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी गोदूबाई. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह होऊन पुढे त्या आनंदीबाई वा बाया कर्वे या नावाने सुपरिचित झाल्या.
1880 च्या नोव्हेंबरात रमाबाईंनी शारदा सदनचे मुंबईतून पुण्यातील कॅम्पात स्थलांतर केले. शारदा सदन ज्या संस्थेतर्फे चालविले जात होते ती रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नसल्याने शारदा सदनचे काम सेक्युलर पद्धतीने चालवावे असा स्पष्ट नियम होता. रमाबाई स्वत: ख्रिस्ती असल्या तरी सदनातील बालविधवांच्या धार्मिक बाबतीत त्यांनी ढवळाढवळ करू नये असा असोसिएशनच्या सल्लागार मंडळींचा आग्रह होता.
मात्र शारदा सदनच्या चालिका स्वत: हे कार्य येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी चालवित असल्याने त्यांच्या जीवनपद्धतीचा, विचारसरणीचा प्रभाव सदनातील कोवळ्या वयाच्या मुलींवर पडणे साहजिकच होते. यातूनच रमाबाई शारदा सदनातील असाहाय्य मुलींवर धर्मांतराची सक्ती करतात, रमाबाई छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत, असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले.
शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी गोदुबाईंचा (बाया) धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला तेव्हा पंडिता रमाबाईंनी शारदा सदनात मोठी जेवणावळ घातली. बाया कर्वे यांनी आपल्या ‘माझे पुराण’ आत्मचरित्रात म्हटले आहे, रमाबाईंनी मला दागिने व कपडे दिले. त्यांच्या जावयाला कर्व्यांना कपडे दिले.’
पंडिता रमाबाईंच्या या जावयाने पुढे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान केले आणि वयाची शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पंडित नेहरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर आणि गोपाळ कृष्ण गोखले आदी मोजक्या व्यक्तींच्या ऋणांचा आदरपूर्वक उल्लेख केला.
शारदा सदनचे काम चालू असतानाच पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबाईंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या 1889 च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.
काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबाईंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने 30 डिसेंबर 1889 च्या अंकात दिले.
1895 साली पुण्यात काँग्रेसचे प्रथम अधिवेशन भरले तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानातून या शहरात जमलेल्या काही पुढाऱ्यांनी शारदा सदनला भेट दिली. तोपर्यंत या सदनातील बारा मुली रमाबार्इंच्या कार्याने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाल्या. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले.
रमाबाईंना जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. रमाबाई असोसिएशनच्या नियमानुसार शारदा सदनात उच्चवर्णीय मुलींसाठी सोवळ्याओवळ्याचे कडकडीत नियम पाळावे लागत असत. असे सोवळ्याओवळ्याचे नियम तेथे पाळले नसते तर अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपल्या बालविधवा मुलींना वा बहिणींना शिक्षणासाठी येथे पाठविलेच नसते.
आपल्या मुली बालविधवा असल्या, समाजात त्या कितीही उपेक्षित असल्या तरी शारदा सदनात त्यांनी सुखात राहावे, असे रमाबाईंना वाटे. शारदा सदनातील घटनांकडे लक्ष असणारे लोक ‘रमाबाई आपल्या मुलींना दुधातुपात नुसते लोळविते’ असे म्हणत. शारदा सदनातील बालविधवांच्या या खाण्यापिण्यावरून एकदा केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रांत वादही झाला होता.
रमाबाई या शारदा सदनातील मुलींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात, हा त्यांच्यावर नेहमी केला जाणारा आरोप. या आरोपामुळे घाबरून काही पालकांनी आपल्या मुली सदनातून काढून घेतल्या. मात्र त्यामुळे या सदनात आश्रयासाठी येणाऱ्या अनाथ, समाजाने टाकून दिलेल्या बालविधवांची संख्या रोडावली नाही. समाजात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या वादळास खंबीरपणे तोंड देऊन पंडिता रमाबाईंनी विधवांच्या पुनर्वसनाचे आपले कार्य चालूच ठेवले.
त्या काळात मुली पाच-सहा वर्षांच्या झाल्या की त्यांची लग्ने उरकून टाकली जात असत. बैरामजी मलबारी या पारशी समाजसुधारकाने बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठविला. या चळवळीचा परिणाम होऊन ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबार्इंनी पुढाकार घेतला. ब्रिटिश सरकारतर्फे सामाजिक सुधारणा लागू करण्यास लोकमान्य टिळकांचा प्रथमपासून विरोध होता. या विधेयकामुळे पुण्यात गोपाळ गणेश आगरकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक आणि या विधेयकास विरोध करणारी सनातनी मंडळी यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला
संमतीवयाच्या विधेयकाविरुद्ध कितीही गदारोळ उठला तरी अखेरीस हे विधेयक मंजूर होऊन तसा कायदा अस्तित्वात आला. आज विशीच्या आत मुलींची सहसा लग्ने होत नाहीत. शंभर वर्षांपूवी मात्र बारा वर्षांखालील मुलींच्या विवाहास विरोध करण्यासाठी रमाबाईंना चळवळ करावी लागली आणि प्रतिकूल टीकेस तोंडही द्यावे लागले.
मध्य भारतात 1897 साली भीषण दुष्काळ पडला तेव्हा भुकेने हाडाचे सापळे झालेल्या शेकडो मुलींना पंडिता रमाबाईंनी आश्रय दिला. या मुलींच्या मदतीला रमाबाई धावून गेल्या नसत्या तर या मुलींना मृत्यूलाच सामोरे जावे लागले असते.
रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील ‘रमाबाई असोसिएशन’ने दहा वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. 1898 मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली.
यानंतर नव्याने स्थापन झालेल्या ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ या संस्थेच्या मदतीने रमाबाईंनी पुण्याजवळील केडगाव येथे ‘मुक्ती सदन’चे काम सुरू केले. त्यानंतर रमाबाईंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालविला.
केडगावात पंडिता रमाबाईंनी समाजाच्या विविध उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळी सदने काढली. एखाद्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले वा त्यांच्यावर एखाद्या अनुचित घटनेची आपत्ती कोसळली की त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला ती स्त्री नकोशी होई, अशा समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी ‘कृपासदन’ उघडले. वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबाईंनी ‘प्रीती सदन’ सुरू केले.
भारतातील पहिली अंधशाळा उघडण्याचे श्रेय रमाबाईंच्या कन्या मनोरमाबाई यांना दिले जाते. अंधत्वामुळे परावलंबी बनलेल्या मुलींना आणि महिलांना केडगावातील ‘बर्तमय सदनात’ आश्रय देऊन रमाबार्इंनी त्यांचे पुनर्वसन केले.
कर्नाटकात जन्मलेल्या रमा डोंगरेला कानडी भाषा येत होती, वडिलांमुळे तिने संस्कृतवर प्रावीण्य मिळविले आणि रमा पुढे ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ बनली. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीवरही प्रभुत्व मिळविले. इंग्रजी शिकून पुढे त्या इंग्लंड आणि अमेरिकेतही व्याख्याने देत फिरल्या.
बायबलच्या मूळ भाषेतून म्हणजे हिब्रू आणि ग्रीक मधून या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या जगातील एकमेव महिला. रमाबाईंच्या बायबलचे भाषांतर त्यांच्या स्वत:च्या केडगावातील छापखान्यातच छापले जात होते.
4 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबाईंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठविले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला.
(`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' लेखक कामिल पारखे, (वितरक सुगावा प्रकाशन ) मधील एक प्रकरण
Comments
Post a Comment